top of page

मन ठेवा रे प्रसन्न ...

Updated: Sep 26, 2023

मन करा रे प्रसन्न

सर्व सिद्धीचे कारण


आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात हा अभंग जेवढा महत्त्वाचा आहे ना, तेवढाच तो उद्योग जगतामध्ये वावरताना उपयोगी आहे. संत तुकारामानी या अभंगामध्ये आपल्याला "गुरुकिल्ली" दिलेली आहे : मन प्रसन्न ठेवण्याची . सकारात्मक दृष्टीकोन अंगी बाळगण्याची .


धावण्याची शर्यत जिंकलेल्या आणि हरलेल्या खेळाडू मध्ये फरक फक्त काही सेकंदाचा नसतो, तर तो त्यांच्या दृष्टिकोनात असतो. दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या स्पर्धकाने पण तेवढीच , किंबहुना जास्त तयारी केलेली असते . पण , प्रथम क्रमांकाने आलेला स्पर्थकाने सरावाबरोबरच, मानसिक तयारी वर भर दिलेला असतो.



आपला उद्योग किंवा व्यवसाय हा पण या शर्यती सारखाच आहे.

या शर्यतीत टिकून राहण्यासाठी, तुम्हाला सतत धावावेच लागेल. मग, वेग कितीही असू द्या .. आणि हो ... ही साधीसुधी नाही , तर अडथळ्याची शर्यत आहे .


अनेक अडथळे तुमची वाट पाहत, दत्त म्हणून उभे आहेत. अडथळे आहेत, म्हणून शर्यत सोडून जाणार की त्यांना मात देत यशस्वी होणार, हा निर्णय सर्वस्वी तुमचा ..


या शर्यतीमध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली तुमच्याजवळच आहे.

हो.

आणि तुमच्याजवळच आहे.

तुमचा सकारात्मक दृष्टिकोन.


पेला अर्धा भरला आहे , यावर काम काम करणे महत्त्वाचे. तरच, पेला पूर्ण भरेल, अन्यथा पूर्ण रिकामा होऊ शकतो. तुमच्या यशात आणि अपयशात सगळं मोठा वाटा हा तुमच्या दृष्टिकोन कसा आहे ? या एका उत्तराचा आहे.

ग्राहक फक्त सेवा ( किंवा वस्तू ) घेण्यासाठी तुमच्याकडे येत नाही , त्याचबरोबर, तुमची काम करण्याची पद्धत , संभाषण , तुमचा दृष्टिकोन ग्राहकाला अधिक आकर्षित करत असतो. तुम्ही जर सकारात्मक असाल , तर ग्राहक तुमच्याकडे, पर्यायाने तुमच्या व्यवसायाकडे अधिक आकर्षित होईल.


कार्यक्षमतेमध्ये वाढ :

निर्णय क्षमता ही उद्योजकांसाठी देणगी आहे. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला अचूक आणि वेळेवर निर्णय घेण्यास प्रोत्साहित करतो. त्याचा परिणाम तुमची एकूणच कार्यक्षमता वाढते. अचूक निर्णय क्षमता आणि कार्यक्षमतेच्या जोरावर यशाचे शिखर गाठणे अवघड नाही. थोडक्यात काय तर यशप्राप्ती साठी सकारात्मक दृष्टिकोनाला पर्याय नाही.


सकारात्मकता ही यशाची गुरुकिल्ली आहे.

नैराश्यापासून दूर :

उद्योग म्हणजे जोखीम. त्यामुळे, मानसिक ताणतणाव असणारच आहेत. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर या मानसिक स्थितीमुळे, होणारे दीर्घकालीन दुष्परिणाम तुम्ही टाळू शकता. रोजच्या दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम होऊ देणार नाही.

दररोज उद्भवणाऱ्या लहान लहान समस्यांमध्ये तुम्ही अडकणार नाही. नैराश्य, विषण्णता या नकारात्मक गोष्टी तुमच्या आणि तुमच्या सहकाऱ्यांना सुद्धा, त्रास देणार नाहीत .


सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे अवघड आहे का?


अवघड नक्कीच नाही

पण, वेळ आणि मनाची तयारी हवी.

कळतंय पण वळत नाही, अशी अवस्था बऱ्याच होता होते. हरकत नाही . प्रयत्नामध्ये सातत्य मात्र हवे. याची सुरुवात तुम्ही स्वसंवादातून करू शकता.



अनोळखी, अनिश्चित आणि खाचखळग्यांनी भरलेल्या या उद्योगजगताच्या प्रवासात जर तुमची कोण सोबत करणार असेल तर तर तो तुमचा तुम्ही विकसित केलेला सकारात्मक दृष्टिकोन.


सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कितीही अवघड प्रसंतून तुम्ही मार्ग काढू शकाल. ध्येपासून अनेक योजने दूर असला तरीदेखील , सकारात्मक दृष्टिकोन दीपस्तंभासारखी अचूक दिशा दाखवेल.


bottom of page